दिवस आणि घटका अज्ञात आहे

36“तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे. 37जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल. 38जलप्रलय येण्यापूर्वी, नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. 39आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल. 40शेतात काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. 41जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.

42“यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही. 43पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते. 44म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.

45“तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबीयांची देखभाल करण्याचे व अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो. 46धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय. 47मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल. 48परंतु समजा तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ 49आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल. 50तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल. 51त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.